Sunday, November 26, 2017

अनभिज्ञ

कशा करू कविता आता
ज्यांचा काही उपयोगच होत नाही,
तुझ्यापर्यंत पोचव्यात या माझ्या इच्छेला
पूर्णत्व ही येत नाही,

नसतील पोचत तुझ्यापर्यंत तर
काय उपयोग आहे कवितांचा,
बंद करावेत हे उपद्व्याप
असा सल्ला आहे अनेकांचा..

त्यांचा सल्ला मानावा की नाही
हाच प्रश्न तसा आहे,
पण शेवटी, तूच आहेस माझ्या आयुष्यात
बाकी सर्व वजा आहे...

कंटाळा आला असेल तुला
माझ्या कवितांचा,
तर तसे सांग ना मला स्पष्ट,
उगीच कशासाठी, अन कुणासाठी
घेतोय मी इतके कष्ट

तू असशील तुझ्या आयुष्यात सुखी
पण माझ्या आयुष्यात मी आहे का ?
तुला याच्याशी काहीच देणे घेणे नाही,
हा माझा विचार तरी खोटा आहे का ?

रहा तू सुखी,
अन अनभिज्ञ माझ्या प्रत्येक गोष्टीशी
आता आयुष्यात कधीच नाही येणार मी
गुंतायला तुझ्यात, आणि बोलायला तुझ्याशी...

-
©सचिन सावंत
२६/११/२०१७

Wednesday, November 8, 2017

माणसाची मानसिकता

माणसाची मानसिकता हल्ली कशी आणि किती कमी कालावधीत बदलेल त्याचा अंदाज लावणे मुश्किल झालेले आहे, म्हणजे परवा परवा पर्यंत आपल्याला एखादी व्यक्ती जशी वाटत असते, त्या व्यक्तीचा स्वभाव जसा वाटत असतो, त्याच्या अगदी विरुद्ध वागणे असते त्या व्यक्तीचे, म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडचे सुद्धा असू शकते. दर्जा बाबत न बोललेलेच ठीक कारण व्यक्तिसापेक्ष हे सिद्धांत बदलत असतात. फक्त आपण विश्वास (खरं तर अंधविश्वास) ठेवलेल्या व्यक्तीने आपल्या कल्पने पलीकडे वागणे हा धक्का आपल्याला पचवता येणे अवघड असते. अशा वेळी मग आपण त्या व्यक्तीला ओळखण्यात चूक केली, असे म्हणावे लागते आणि आपल्या मनाला समजवावे लागते. पण इतका साधा सरळ विचार करून चालण्यासारखे असते का ? तर नाही. वागण्यातील बदल कोणत्या पातळीवरचा आहे यावर हे ठरते. मग ते "ठीक आहे" इथपासून ते "त्या व्यक्तीला संपवून टाकले पाहिजे" इथपर्यंत काहीही असू शकतो.
सर्वात मोठी शोकांतिका कधी असते? एखादी व्यक्ती आपल्याशी कायम खोटं बोलत राहिली आहे, कायम विश्वासघात करत राहिली आहे, ही जाणीव होणे. आणि मग स्वतः ला स्वतःवरच राग यायला लागतो. कारण माणूस ओळखण्यात चूक झालेली असते. अशा वेळी आपलीच कसोटी असते, ती म्हणजे आपण यातून किती लवकर सावरतो याची. किंबहुना सावरु शकतो की नाही याची.
-
© सचिन सावंत

Wednesday, November 1, 2017

आठवणी

मान्य आहे मला
माझ्या जीवनात नाहीस आता तू..
तुझं #अस्तित्व,
तुझं #हास्य,
तुझी माझ्याशी बोलण्याची #अधीरता,
मला भेटण्याची #ओढ,
तुझी माझ्याबद्दलची #काळजी,
काहीच उरलं नाहीये आता..

कसा विसरू मी,
तुझे उष्ण श्वास,
तुझी घट्ट मिठी,
तुझं माझ्या बाहुपाशात विसावणं,
तुझं माझ्यात आपोआप विरघळत जाणं,
तुझं माझ्याकडे पहात राहणं,
आणि म्हणणं,
तुमचा चेहेरा खूप छान वाटतो मला..

नाही राहिले माझे काहीही आता,
पण
एक गोष्ट आहे माझ्याजवळ,
जी कोणी कधीच हिरावून घेऊ शकत नाही माझ्याकडून...
'तुझ्या आठवणी.'

आठवणी हीच अशी गोष्ट आहे,
ज्यांच्यावर #हक्क माझाच आहे,
आणि माझाच राहील,
कायमस्वरूपी..

कितीही प्रयत्न केला कुणीही तरी
तुला माझ्या आठवणीतून कोणीही #हिरावून नाही ना घेऊ शकत..
स्वतः तू ही नाही..

या आठवणी माझ्या #सोबतच राहतील नेहेमी,
आणि माझ्यासोबतच जातील,
विस्मृतीत सर्वांच्या...

तेव्हा तरी माझी तू आठवण काढशील का ?
हाच एक यक्ष प्रश्न उरलाय..
-
© सचिन सावंत